वाशिम - आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना त्यांच्या घरी खते आणि बियाणे उपलब्ध करण्यासाठी कृषी विभागाकडून 'कृषी विभाग आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला कारंजा तालुक्यात उदंड प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासणार नाही. तसेच फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या घरीच बियाणे क्षमता तपासून पेरावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाय योजना करीत आहे. या अंतर्गत कृषीसेवा केंद्रात खरीप हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर निविष्ठाच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार जिल्हाभरात खते, बियाणे शेतकऱ्यांच्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याबाबत वाशीम जिल्ह्यातील कृषी अधिकारी शेतकऱ्याच्या दारी जाऊन मार्गदर्शन करत आहेत. गेल्या वर्षी सोयाबीन कापणीच्या वेळी झालेल्या पावसाने या वर्षी सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी घरीच बियाणाची उगवणशक्ती तपासून तेच बियाणे वापरावे, असा सल्ला कारंजा येथील कृषी अधिकारी संतोष वाळके शेतकऱ्याच्या दारी जाऊन देत आहेत.