वर्धा - आष्टी तालुक्यातील पारडी येथे गावाच्या वेशीवर असलेल्या वैरणीला (जनावरांचा चारा) शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. येथे बांधलेल्या ५ जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर १० ते १२ जनावरे आगीत गंभीर भाजली आहेत. अग्निशामकच्या साहाय्याने लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तोपर्यंत, काही जनावरे दगावली. या घटनेने काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ही आग सुरुवातीला गावठाणावर दुपारच्या वेळी लागली. वर्षभरासाठी साठवून ठेवलेल्या वैरणीवर आगीची ठिणगी पडली असावी आणि त्यातून ही प्रचंड आग लागल्याचा अंदाज आहे. या आगीने उग्र रूप धारण केले आणि लगतच्या गोठ्यात जाऊन पोहचली. यामुळे खुंट्याला बांधून असलेली जनावरे आगीचे लोळ पोहचताच हंबरडा फोडू लागली. काही जनावरे भाजली गेल्याने खुंटा तोडून पळत रानाकडे गेली. तर पाच जनावरं होपळून दगावली.
गावातील लोकांना आगीची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा सुरू झाला. पण मोठ्या प्रमाणात वैरण साठवून ठेवले असल्याने आगीने सगळे वैरण कवेत घेत रौद्र रूप धारण केले. आष्टी तसेच आर्वी येथील अग्निशाम बंब बोलवून पाण्याचा मारा करण्यात आला. तळेगाव पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला.
उन्हाळा लागताच आगीच्या घटनेत वाढ
उन्हाळा सुरू झाला की तापमानात प्रचंड वाढ होते. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. या दिवसात छोटीशी ठिणगी मोठे उग्र रुप धारण करू शकते. खासकरून जनावरांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी. दोन वर्षांपूर्वी कारंजा तालुक्यातील अशाच एका आगीत ३५ ते ४० दुधाळ जनावरे दगावली. यात शेतकऱ्याचे दुधाळ जनावर मरण पावल्याने प्रचंड नुकसान सोसावे लागले होते.