वर्धा - समाजात आजही दिव्यांग म्हटले की त्याच्या शारीरिक कमजोरीचा बाऊ केला जातो. हसत खिल्ली उडवले जाते, हिनवले जाते. मात्र, याला खचून न जाता जिद्दीची धार देत खडतर आयुष्यातून मार्ग काढला आहे, रोहित या मुलाने. चक्षु नसताना डोळे दिपवणारे यश १० वीच्या परीक्षेत रोहितने मिळवले. ७१.२० टक्के गुण मिळवत त्याने दिव्यांगत्वाला मागे टाकला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात १० वीच्या वर्गातील रोहित तिवारीचा निकाल आला. या निकालात त्याला ७१.२० टक्के गुण मिळाले. त्याच्या या यशाचे कौतुक होत आहे. त्याला पेढे भरवले जात आहे. पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. पण त्याच्या बुद्धीचा प्रकाश आज दिसत असला तरी आयुष्याच्या अंधारात अनेक रात्र रोहित आणि आईने जागून काढले आहे.
रोहितला हे यश मिळवणे तेवढेच कठीण आणि खडतर होते. कारण त्याच्यासमोर होते केवळ पांढऱ्या कागदावरील ब्रेल लिपी. परंतु, त्याने हे सर्व काही शिकून घेतले. पुस्तक कुठल्याही विषयाचे असो. रोहितचे बोट त्याचे डोळे झाले. त्याच्या बोटांनी एकदा स्पर्श केला की तो वाचायला सुरुवात करतो. कुठलाही शिकवणीचा आधार न घेता त्याने यश संपादन केले. त्याला मराठीत ६८ गुण आहेत. तर ज्या इंग्रजीची अनेकांना भीती वाटते त्या विषयात त्याने ७१ गुण मिळवले.
रोहितच्या या यशात त्याच्या आईचा मोठा वाटा आहे. कारण रोहितच्या आईसोबत शिक्षक होण्याचा भार त्यांनी उचललाय. ममता तिवारी यांचे केवळ ६ वी पर्यंतच शिक्षण झाले आहे. पण मुलांसाठी त्यांनी सगळे शिकून घेतले. एवढेच काय ब्रेल लिपी शिकून घेत त्याचा अभ्यासही ते घेतात आणि शिकवतात. लहान असताना आई त्याचा पाठीमागे सावलीसारखी राहायची. शाळेत दिवसभर त्याचसोबत असायची. शाळेत स्वतः शिकत आणि घरी येऊन रोहितला शिकवत असे. हे फळ अनेक वर्षांच्या तपश्चर्येतून आले आहे.
रोहितचे ५ वी ते ७ वी पर्यंतचे शिक्षण मुंबईतल्या शाळेत झाले. हे दोन वर्ष त्याचासाठी खडतर राहिले. पण यातूनच त्याला अभ्यासाची जिद्द मिळाली. इथे त्याला वेडा म्हणून हिनवले गेले. पण तो रडत हताश होऊन न बसता ते विसरून जिद्दीने लढाईला सुरुवात केली. दिवस रात्र एक करत सर्वसामान्य शाळेत शिकून गुण मिळवले. त्याला ९० टक्के मिळेल अशी आशा होती. पण ७१.२० टक्के गुण मिळाल्याचे तो सांगतो. आता त्याला शिक्षक बनवून इतरांना शिकवायचे आहे. त्याला वेडा म्हणणाऱ्यांना दाखवून द्यायचे आहे, असे रोहित आवर्जून सांगतो.