ठाणे - भिवंडी शहरातील निजामपुरा चांद तारा ते पटेल मज्जीद पर्यंतच्या निवासी वस्तीमधील डझनभर घरांची कडी तोडून चोरट्यांनी चोरी केली. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यात काहींच्या घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पोबारा झाले आहे. निवासी वस्तीमधील काही नागरिकांच्या घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पोलीस बघ्यांची भूमिका घेत आहे.
चोरट्यांनी अशा प्रकारे घरफोडी केली पालिका शिक्षण मंडळाच्या शाळेतील शिक्षक मोहसीना अब्दुल शेख यांच्या घरातून एक लाख 17 हजार चारशे रुपये किमतीचे सुमारे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. सोबत 15 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 32 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. त्यांच्या घरात लाईट नव्हती. त्यामुळे ते कुटुंबासह जवळच असलेल्या आईच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. नेमकी हीच संधी चोरट्यांनी साधून घरफोडी केली. सकाळी उठून ते घरी आले असता, चोरीचा प्रकार उघड झाला. या चोरीच्या घटनेने त्यांच्या आईला मानसिक धक्का बसला असून त्या आजारी पडल्या आहेत.
त्याचप्रमाणे नबील भरमाल हे कुटुंबासह महाबळेश्वर येथे पिकनिकला गेले होते. त्यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरातून दीड लाख किंमतीचे दागिने व 35 हजार रुपये रोख लंपास केली. तसेच जलील रईस व झहीर यांच्या घराचेही कुलूप तोडण्यात आले, मात्र चोरट्यांना काही सापडले नाही. रिक्षाचालक मोहम्मद यांच्या घरातुन 600 रुपये, तसेच हमीद अन्सारी, वनडे मसालावाला व कुरेशी आदींच्या घरांचे टाळे फोडणीत आले. या व्यतिरिक्त नाती यांच्या घरातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरीला गेली आहे. चोरीच्या घटना प्रकरणी निजामपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र एकाच रात्रीत एकाच वस्तीतील लागोपाठ बारा घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याने पोलिसांच्या गस्तीवर संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष -
भिवंडी शहर परिसरात गुन्हेगारांच्या घटनांनी कळस गाठला आहे. तरीदेखील पोलिस केवळ बघ्याचीच भूमिका घेत आहे. भारतीय दंड संहितेतील असे एकही कलम नाही की, त्यातील कलमान्वये शहरात रोजचे गुन्हे दाखल होत नाही. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा निष्कळ ठरली आहे. खुन, बलात्कार, अपहरण, लूटमार, घरफोडी आदी घटना नित्याच्याच झाल्या आहेत. त्यातच 24 तासांत 2 खून, 5 अपहरण आणि 2 बलात्कारांचे गुन्हे घडलेले असतानाच पहाटेच्या सुमारास निजामपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 नागरिकांच्या घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.