ठाणे - अंबरनाथमधील एमआयडीसीजवळ छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या पाच जीन्स वॉश कारखान्यांवर अंबरनाथ नगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारखाने सील केले आहे. विशेष म्हणजे राजकीय आश्रयातूनच हे बेकायदा कारखाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
68 कंपन्यांना बजावल्या नोटीस-
नदीसह परिसरात प्रदूषण करणाऱ्या जीन्स वॉश कारखान्यांवर छापे
अंबरनाथमधील एमआयडीसीजवळ छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या पाच जीन्स वॉश कारखान्यांवर अंबरनाथ नगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारखाने सील केले आहे.
काही दिवसांपासून अंबरनाथ व उल्हासनगरमधून वाहणाऱ्या वालधुनी नदीत रासायनिक पाण्यातून उद्भवणारे जल आणि वायू प्रदूषणाच्या मुद्यामुळे एमपीसीबीकडून आनंदनगर एमआयडीसीतील कंपन्यांची झाडाझडती सुरू होती. गेल्या दोन महिन्यांत जवळपास 68 कंपन्यांना एमपीसीबीने नोटीस बजावल्या होत्या. या घटनेनंतर वालधुनीच्या पात्रात उग्र दर्प असलेले रसायन सोडल्याचे प्रकरण नुकतेच समोर आल्याने, रासायनिक कंपन्या आणि रसायन सोडणाऱ्या टँकर लॉबी एमपीसीबी आणि प्रशासकीय यंत्रणांना घाबरत नसल्याचे समोर आले होते.