ठाणे - उल्हासनगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज (शुक्रवारी) सकाळी होणार आहे. विशेष म्हणजे पालिकेतही महाविकास आघाडी सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाईसह टीम ओमी कलानीही महाविकास आघाडीला साथ देणार आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना बाजी मारणार असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या लीलाबाई आशान विरुद्ध भाजपचे जीवन इदनानी यांच्यात सरळ लढत होणार आहे.
'महाविकास आघाडी'मुळे शिवसेनेचे पारडे जड हेही वाचा-केवळ १ रुपया प्रतिएकर दराने १५ एकर जमीन बळकावली; पतंजलीला उच्च न्यायालयाची नोटीस
विशेष म्हणजे महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपनेही व्हीप जाहीर करीत जीवन ईदनानी यांचा ११ नगरसेवक असलेला साई पक्ष भाजपमध्ये विलीन करून निवडणुकीत रंगत आणली आहे. आता भाजपने महापौर पदाचे उमेदवार जीवन ईदनानी तर विजय पाटील हे उपमहापौर पदाचे उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे. उल्हासनगरमध्ये सत्तेत असलेल्या भाजप आणि साई पक्ष दोघांनीही महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून जमनादास पुरस्वानी आणि साई पक्षाकडून जीवन ईदनानी यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केले होते. तर भाजपकडून विजय पाटील आणि साई पक्षाकडून टोनी सिरवानी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. मात्र, साई पक्ष हा अखेरपर्यंत महापौर पदावर कायम राहिला आहे. यामुळे अखेर भाजपचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तो सफल होऊ शकला नाही. अखेर साई पक्षालाच भाजपमध्ये विलीन केल्यास महापौर पद देऊ, अशी अट साई पक्षाला रवींद्र चव्हाण यांनी घातली. ती जीवन इदनानी आणि त्यांच्या नगरसेवकांनी मान्य केल्याने जीवन इदनानी हे महापौर पदाचे तर विजय पाटील हे उप महापौर पदाचे उमेदवार असणार, हे निश्चित झाले आहे. भाजप गटनेता जमनादास पुरसवानी यांनी भाजपच्या ३१ नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. मात्र, सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या ४० नगरसवेकांच्या आकड्याची जुळवाजुळव शिवसेने केल्याची माहिती सूत्राने दिली आहे. तर भाजपनेही राजकीय खेळी करीत आमचाच महापौर होणार असल्याचे संकेत दिल्याने कोणाला दगाफटका बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीला अडीच वर्षांचा कालावधी आहे. या पार्श्वभूमीवर कालानी गटाचे ११ नगरसेवक भाजपचा व्हीप मोडण्याची हिंमत दाखवतील का? हा औत्सुक्याचा विषय बनला आहे. पंचम कालानी यांना भाजपने विधानसभेचे तिकीट न दिल्यामुळे कालानी गट भाजपपासून दुरावला आहे.