ठाणे: कल्याणच्या सुफाला सोसायटीत राहणारे जयेश द्वारकादास राजा यांनाही कोविड आजाराची लागण झाल्याने त्यांच्यावर कल्याण पश्चिम भागातील रिद्दी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचाराचे एकूण बिल ४ लाख ४७ हजार ७७१ रुपये झाले होते. त्यानंतर विमा कंपनीने त्यांना केवळ १ लाख ३४ हजार रुपये मंजूर केले होते. त्यावर राजा यांनी आक्षेप घेत ठाणे जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाकडे विमा कंपनी विरोधात दावा दाखल केला. या दाव्यावर ६ एप्रिल २०२२ रोजी अंतिम सुनावणी झाली.
विमा कंपनी याबाबत अपयशी:या दरम्यान राजा यांनी रुग्णालयाच्या ३ लाख १३ लाख ७७१ दाव्याची शिल्लक रक्कम आणि त्याच्या मानसिक छळाची आणि खटल्याच्या खर्चाची नुकसान भरपाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी ग्राहक मंचाकडे केली. विशेष म्हणजे, राजा यांची फेब्रुवारी २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीसाठी 'मेडिक्लेम विमा पॉलिसी' मिळवली होती. त्यांच्या विम्याची रक्कम ५ लाख २५ हजार रुपये असल्याचे पुरावे त्यांनी ग्राहक न्यायालयात दिले. त्यानंतर ग्राहक मंचाकडून विमा कंपनीला नोटीस बजावण्यात आली. तरी देखील दाव्याच्या रकमेसाठी केवळ १ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम का मंजूर करण्यात आली? हे सिद्ध करण्यात विमा कंपनी अपयशी ठरली.