ठाणे -शेतकऱ्यांच्या आठवडा बाजारासाठी यापुढे शहरातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या पदपथांवरील मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने राज्यातील मुंबई, ठाण्यासह सर्वच महापालिकांना दिले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील सेंद्रीय खताच्या मदतीने पिकवलेला भाजीपाला ग्राहकांना थेट मिळावा आणि दलाली कमी व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.
सेंद्रीय खतावर तयार झालेली प्रदूषणविरहित भाजी घेण्यासाठी ग्राहकदेखील थोडे अधिक पैसे मोजण्यास तयार असतात. पण शेतकऱ्यांच्या आठवडा बाजारासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. मात्र, आता यापुढे हा बाजार शहरातील प्रमुख रस्त्यालगत असलेल्या पदपथांवरील मोकळ्या जागेत भरवण्याचे आदेश सरकारने राज्यातील सर्वच महापालिकांना दिले आहेत. पदपथांवर भरविण्यात आलेल्या आंबा बाजारामुळे ठाण्यात नुकताच मोठा राजकीय वाद झाला होता. त्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नेहमीच्या फेरीवाल्यांसह या आठवडा बाजारांमुळे पदपथ व्यापले जाण्याची भीती आहे.