मीरा भाईंदर - मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय राहत असून मागील अनेक वर्षांपासून वारकरी भवन शहरात उभे राहावे अशी मागणी करण्यात आली होती.यासाठी पत्रकार नामदेव काशीद यांनी पुढाकार घेतला होता.अखेर राज्य सरकार तसेच पालिका प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली. काशीमीरा परिसरातील एका भूखंडावर दोन मजली इमारत उभी राहणार आहे.यासाठी राज्य शासनाने दोन कोटी निधी मंजूर केला आहे.
महाराष्ट्रातील पाहिल्या संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवनचे भूमिपूजन
मीरा भाईंदर शहरात महाराष्ट्रातील पहिल्या वारकरी भवनांचे भूमिपूजन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वारकरी भवन पुढच्या वर्षी डिसेंबर पर्यंत उभे राहिल अशी ग्वाही पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.
भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला आहे.कीर्तन ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी त्यांनी अनेक उदाहरण देत आपल्या मिश्किल भाषेत मनोरंजन केले तर शिक्षक,पदवीदार कोट्यातून आमदार निवडून जातात त्याच प्रमाणे वारकरी संप्रदाय मधून एक आमदार घेतला पाहिजे असं मत इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केले.
मीरा भाईंदर शहरात राज्यातील पाहिले वारकरी भवन तयार होत असून माझ्या मतदारसंघात भव्य इमारत उभी राहत आहे त्याचा मला अभिमान आहे.ही इमारत लवकरात लवकर उभी राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहे.भविष्यात वारकरी संप्रदायसाठी जी मदत लागेल त्यासाठी मी आणि राज्यसरकार सोबत असल्याचं मत आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.यावेळी आमदार गीता जैन,पालिका आयुक्त दिलीप ढोले,पालिका अधिकारी,कर्मचारी,माजी नगरसेवक उपस्थित होते.