ठाणे : पूवर्वैमनस्यातून एका सराईत गुन्हेगाराची ६ जणांच्या टोळीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी त्या ६ हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. वेद प्रकाश तिवारी उर्फ गोलु असे निर्घृण हत्या झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर विनोद मगरे, समीर उर्फ लखु शेख, दीपक शिंदे, रवी खांडेकर, रवी वाघ, दीपक सुरडकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहे.
उल्हासनगरात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची हत्या ; सहा हल्लेखोरांना अटक
पूवर्वैमनस्यातून एका सराईत गुन्हेगाराची ६ जणांच्या टोळीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प तीनमधील खन्ना कंपाउंट येथे मृतक वेद प्रकाश तिवारी उर्फ गोलु राहत होता. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी वाद झाल्याने मृत वेद प्रकाश तिवारी उर्फ गोलु याने त्या तरूणाला मारहाण केली होती. त्यामुळे चाळीतील संतापलेले लोक गोलुला मारण्यासाठी धावले. मृत वेदप्रकाश उर्फ गोलु हा आपला जीव वाचवण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळत असताना आरोपी विनोद मगरे, समीर उर्फ लखु शेख, दीपक शिंदे, रवी खांडेकर, रवी वाघ, दीपक सुरडकर या ६ जणांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्यावर धारदार चाकुु, लोखंडी कोयता व दगडाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करून पळुन गेले होते. जखमी वेदप्रकाश उर्फ गोलुला नजीकच्या मीरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदशर्नाखाली गुन्हे प्रकटीकरण टीमचे एपीआय अस्लम खतीब, पोलीस हवालदार विजय बनसोडे , पोलीस नाईक विनोद कामडी, पोलीस शिपाई योगेश शिंदे, सतीश सोनावणे, आर. डी. पाटील, प्रवीण कुंभार, सुभाष चव्हाण, प्रदीप खरमाळे यांच्या पथकाने काही तासातच त्या गुन्ह्यातील पसार झालेल्या सहाही आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात त्या ६ आरोपीं विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकरे करीत आहेत.