महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बनावट कंपन्या बनवून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ५ आरोपींना अटक, ठाणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

बनावट कंपन्या बनवून गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तपासात या टोळीने एकूण ९ गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी ४० लाख २७ हजाराची फसवणूक केल्याचे उघड झाले.

By

Published : Apr 5, 2019, 12:00 PM IST

करोडोंची फसवणूक करणाऱ्या ५ आरोपींना अटक

ठाणे- बनावट कंपन्या बनवून गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने आतापर्यंत ९ गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी ४० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. तर फसवणूक झालेल्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी संजय जाधव यांनी दिली.

करोडोंची फसवणूक करणाऱ्या ५ आरोपींना अटक

या टोळीने रेडरॉकगेम, टिप्सझोन अॅडवायझरी प्रा. लि., किप्टो ट्रेड डब्ल्यूएस आणि जीआ कुल इत्यादी बनावट कंपन्या काढून त्याद्वारे ही फसवणुकी सुरू केली होती. ही टोळी अनेक गुंतवणूकदारांना कमी कालावधीत जास्त पैसे परत देण्याचे आमिष दाखवत होती. तर गुंतवणूक केलेल्या पैशावर दर दिवशी १ टक्का व्याज देण्याचे आश्वासन देत असत.

जो व्यक्ती या कंपनीत गुंतवणूकदार घेऊन येईल त्यांना देखील या टोळीने दर आठवड्याला ३ टक्के रॉयल्टी देण्याचे आमिष दाखवत असत. या टोळीच्या भूलथापांना भुलून अनेक गुंतवणूकदारांनी आपले पैसे या कंपन्यांमध्ये गुंतवले होते. मात्र, या भामट्या मंडळींनी कुठल्याही प्रकारे व्याज न देता लोकांनी गुंतवलेले पैसे देखील हडपले.

या टोळीकडून फसवणूक झालेल्या एका व्यक्तीने याप्रकरणी कापूरबावडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले. गुन्हे शाखेच्या तपासात या टोळीने एकूण ९ गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी ४० लाख २७ हजाराची फसवणूक केल्याचे उघड झाले. तर बोगस कंपन्या स्थापन करून फसवणारी टोळी फरार झाल्याचे देखील समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळे पथक बनवून दिल्ली व गुजरात येथून या टोळीतील प्रकाश गोविंद मोरे (वय- ५२, राहणार- ११०४, महावीर हाईट्स नंबर २, खडकपाडा, कल्याण), संदीप गोविंद पाटील (४२, वाघबिल नाका, घोडबंदर रोड ठाणे), उमंग कणकभाई शाह (२७, सुरत, गुजरात), अजय महेशचंद्र जरीवाला (४३, उदना, सुरत, गुजरात) आणि रितेश सुरेशचंद्र पटेल (३५, वलसाड, गुजरात) या पाचही भामट्यांच्या मुसक्या आवळल्या. या टोळीत आणखी कोण सामील आहेत आणि या टोळीने एकूण किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास सुरू असल्याचे डीसीपी जाधव यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details