सोलापूर -जिल्ह्यातील शिरपूर गावातील शेतकरी मोहन दत्तात्रय अदमाने या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. मोहन अदमाने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.
हेही वाचा -सातारा येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीचा सोलापुरात निषेध
मोटारसायकलवरून मोहोळवरून लांबोटीकडे येत असताना अदमाने यांच्या दुचाकीला आरटीओ अधिकाऱ्यांची गाडी ओव्हरटेक करत पुढे गेली. पुढे असणाऱ्या कंटेनरला आरटीओ अधिकाऱ्यांनी गाडी आडवी लावल्यामुळे त्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मोहन आदमाने हे त्या कंटेनरला पाठीमागून जाऊन धडकले. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. मात्र, आरटीओ अधीकारी यांनी या आरोपाला फेटाळून लावले आहे.
चिडलेल्या ग्रामस्थांनी मृत्यूस कारणीभूत आरटीओ अधिकारी आहेत, असा आरोप करत, आरटीओ अधिकाऱ्यांचे वाहन फोडले. आणि त्यांना जबर मारहाण केली. यामुळे सोलापूर पुणे महामार्गावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. जखमी आरटीओ अधिकाऱ्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर, मोहन अदमाने यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
आरटीओच्या चुकीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू, ग्रामस्थांचा आरोप
अपघातात मोहन अदमाने यांचा जागीच मृत्यू झाला. आरटीओ अधिकाऱ्यांनी महामार्गावर वेगात असलेल्या कंटेनरला थांबविले नसते तर हा अपघात झाला नसता. आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे अपघात झाला, असा आरोप करत उपस्थित नागरिकांनी आरटीओ कार्यालयाच्या वाहनाची मोडतोड केली आहे. या अपघाताला तेच जबाबदार आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी भूमिका घेत नातेवाईकांनी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.