सोलापूर- जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का जाम आंदोलन म्हणजेच रास्ता रोको आंदोलन केले. सोलापूर पुणे महामार्गावरील सावळेश्वर ,बार्शी येथील राळेरास,पंढरपूर,टेभुर्णी,मंद्रुप आदी ठिकाणी विविध मागण्या घेऊन रास्ता रोको झाले. या आंदोलनामुळे काही तास वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाभरात चक्का जाम कृषी कायद्याला विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. महामार्ग वाहतूक रोखून रस्ता रोखण्यात आला. यामुळे काही तास सर्व प्रकारची वाहतूक सेवा थांबून होती. कृषी कायद्याला विरोध व साखर कारखान्यांनी एफआरपी ठरवूनच ऊस गाळप सुरू करावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांना काही कार्पोरेट कंपन्यांचे गुलाम बनून राहावे लागेल
केंद्र सरकारने लोकसभेत व राज्यसभेत शेतकरी विरोधात कायदे मंजूर केले आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना काही कार्पोरेट कंपन्यांचे गुलाम बनून राहावे लागेल. या कायद्यात हमी भावाचा कुठेही उल्लेख नाही. यामुळे सर्वसामान्य शेतकरी उद्ध्वस्त होतील. शेतकरी हितासाठी असे जाचक कायदे रद्द करावे, अशी मागणी करत रस्ता रोखण्यात आला.
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी महामार्गाच्या मधोमध बसून भाषणे केली. यावेळी विजय रणदिवे यांनी बोलताना सांगितले की, ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून साखर करखान्यांनी ऊसदर जाहीर न करताच गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी मागील थकीत बिले न काढताच नवीन गाळप घेण्यास सुरुवात केली आहे. मागील ऊस बिले न देणाऱ्या साखर कारखान्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी पप्पू पाटील, सदाशिव वाघमोडे, सूरज शेळके, सचिन म्हस्के, दिनेश शिंदे, विजय साठे, पोपट साठे आदी उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
- कृषी कायदा रद्द करा
- साखर कारखान्यांनी ऊस दर (एफआरपी) जाहीर करूनच गाळप सुरू करावे.
- मागील बिले थकीत असलेल्या साखर कारखान्यांवर गुन्हे दाखल करा.
- शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलणाऱ्या साखर कारखान्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.