सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मालवण व वेंगुर्ला येथील नुकसानग्रस्त नागरिकांशी देखील त्यांनी चर्चा केली. कोकण आणि माझे नाते अतूट आहे ते कोणीही तोडू शकत नाही. विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच कोकणवासीयांनी राज्याला होता होईल तेवढी मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले.
पंचनाम्यामधून सुमारे 10 कोटी रूपयांचे नुकसान -
चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यामधून सुमारे 10 कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. किनारी भागातील मच्छिमार बांधव आणि हापूस व काजू बागायतीचे या वादळात मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीचे देखील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्या चे समोर आले आहे. काही भागांमध्ये आजही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तर किनारी भागामध्ये अनेक गोड्या पाण्याच्या विहिरी मध्ये समुद्राचे खारे पाणी गेल्याने या भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत या ठिकाणच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांच्या समोर स्थानिक मच्छीमार नागरिकांनी आपली व्यथा मांडताना सरकारने आपल्याला भरघोस मदत करावी अशी मागणी केली आहे.