मेढा न्यायालयात 'किसनवीर'च्या बाजूने निकाल; सर्व 45 खटल्यात निर्दोष
शेतकऱ्यांना बांधावर ऊस बियाणे पोहोच केलेल्या योजनेवर आक्षेप घेत विरोधकांनी भुईंजच्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर 45 फौजदारी खटले दाखल केले होते. यातील शेवटच्या खटल्याचा निकाल आज लागून सर्वच्यासर्व 45 खटल्यांचा निकाल 'किसनवीर' च्या बाजूने लागला आहे.
सातारा -शेतकऱ्यांना बांधावर ऊस बियाणे पोहोच केलेल्या योजनेवर आक्षेप घेत विरोधकांनी भुईंजच्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर 45 फौजदारी खटले दाखल केले होते. यातील शेवटच्या खटल्याचा निकाल आज लागून सर्वच्यासर्व 45 खटल्यांचा निकाल 'किसनवीर' च्या बाजूने लागला आहे. या निकालामुळे कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर व अधिकाऱ्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले आहे.
मेढा न्यायालयाने दिला निकाल -
या शेवटच्या खटल्याची सुनावणी मेढा न्यायालयात होऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एम. काळे यांनी हा निकाल दिला. या योजनेचे कारण पुढे करीत विरोधकांनी भुईंज (ता.वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर 45 खटले दाखल केले होते. वास्तविक कार्यक्षेत्रात पुरेशा उसाची उपलब्धता होण्यासाठी 2004 साली ही योजना बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने राबवली गेली होती.
अपहाराची तक्रार -
या प्रकरणांमध्ये कवठे (ता. वाई) येथील राहुल मधुकर डेरे यांनी मेढा पोलीस ठाण्यात कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी -अधिकारी यांना संगनमताने बनावट कागदपत्र तयार करून 8,750 रुपयांचा अपहार केल्याची तक्रार केली होती. मेढा न्यायालयात त्याची सुनावणी होऊन या खटल्यातून सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2004-5 या वर्षात कारखान्यात कमी गळीत झाले होते. त्यामुळे कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता व्हावी यासाठी बँकेच्या सहकार्याने कारखान्याच्या वतीने योजना राबवली गेली. या योजनेचा लाभ 2,725 शेतकऱ्यांनी घेत 1608.91 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली. विरोधकांनी 45 जणांना पुढे करत वाई न्यायालयात 37, सातारा दोन व मेढा न्यायालयात 6 खटले दाखल केले होते. त्या सर्वच्यासर्व खटल्यात मधून मदन भोसले, गजानन बाबर व इतरांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल. या खटल्यात कारखान्याच्या पदाधिकार्यांच्या वतीने ॲड. ताहेर मणेर, ॲड. दिनेश धुमाळ, ॲड. साहेबराव जाधव. ॲड. विद्या धुमाळ, ॲड. भारती कोरवार तसेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने ॲड. सुरेश खामकर यांनी काम पाहिले.
न्यायदेवतेने न्याय केला - मदन भोसले
शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनेबाबत खटले दाखल केले गेले. व्यक्तिगत माझ्यावर राग असेल तर समजू शकतो, त्यावर माझा बिलकुल आक्षेप नाही. मात्र स्वतःच्या आसूयेपोटी संस्था वेठीस धरताना काहीच कसं वाटलं नाही? संस्था कशी बंद पडेल असाच प्रयत्न तक्रारदार यांच्या बोलवत्याधन्यांनी वारंवार केला. न्यायदेवतेने आज न्याय केला, अशी प्रतिक्रिया किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केली.