सांगली- राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे. त्यामुळे राज्यातील भाजपाने केंद्राकडून मदत आणावी, असा टोला कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी लगावला आहे. तसेच राज्यातील 45 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही यावेळी कदम यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्र्यांनी आज सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्यातील शेती नुकसानाचा आढावा दिला आहे. राज्यात जवळपास 45 लाख हेक्टर शेतीचे सध्या नुकसान झाले आहे. 70 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित 30 टक्के पंचनामे येत्या काही दिवसात पूर्ण होतील. त्यामुळे नुकसान क्षेत्राचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व परिस्थितीमध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळेच दहा हजार कोटींची मदत सरकारने जाहीर केली आहे.
केंद्रातून मदत आणा -
राज्य सरकारच्या मदत देण्यावरून टीका करणाऱ्या राज्यातील भाजपावर निशाणा साधताना राज्य सरकारने आता मदत जाहीर केली आहे. त्यामुळे टीका करणाऱ्या राज्यातील भाजपाने केंद्रात असणाऱ्या त्यांच्या सरकारकडून मदतीची मागणी करून मदत आणावी, असा टोला कदम यांनी राज्यातील भाजपाला लगावला आहे. तसेच केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तातडीने एनडीआरएफ पथक पाठवावे, अशी मागणीही यावेळी कदम यांनी केली आहे.