सांगली - पत्नीनेच पतीचा गळा चिरुन खून केल्यानंतर आत्महत्येचा बनाव केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने खुनाच्या या घटनेला वाचा फोडली. ही घटना तासगावमधील इंदिरानगरमध्ये बुधवारी मध्यरात्री घडली. शांताबाई कल्लू बागडी असे त्या खुनी पत्नीचे तर कल्लापा उर्फ कल्लू शिवाजी बागडी असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी खुनी पत्नी शांताबाईला बेड्या ठोकल्या आहेत.
तासगावातील इंदिरानगरात कल्लापा उर्फ कल्लू ( वय -४० ) हा आपल्या पत्नीसह राहतो. कल्लु हा गेल्या काही वर्षापासून क्षयरोगाने ग्रस्त होता. त्यामुळे त्याची सतत चिडचिड होत होती. त्यातच तो सतत शांताबाईवर संशय घेत होता. त्यामुळे शांताबाई पुरती वैतागली होती.
बुधवारी रात्री बाराच्या दरम्यान त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वादावादी झाली. यावेळी मीच मरतो, असे सांगून घरातील चाकूसारखे धारदार शस्त्र घेवून कल्लू घरातून बाहेर पडला. व घराच्या मागील असणार्या खोलीत गेला. यावेळी पत्नी शांताबाईही त्याठिकाणी आली. कल्लूने चाकू गळ्याला लावून मरण्याची धमकी दिली. यावेळी शांताबाईने ‘तू कशाला मरतो, मीच तुला मारते’, असे म्हणून चाकू धरण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कल्लूच्या गळ्याला चाकू लागला. दरम्यान कल्लू रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी शांताबाईने आणखी एकदा त्याच ठिकाणी चाकूने जोरदार वार केला. त्यामुळे कल्लूचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी शांताबाईने आरडाओरड करुन नवरा सापडत नसल्याची आवई उठवली. काही वेळाने घराच्या मागील खोलीत नवरा मरुन पडल्याचे दिसून आल्याचे नाटक करत रात्रीच्या सुमारास शांताबाईने थेट पोलीस ठाण्यात जाऊन नवर्याने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती दिली. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी बारकाईने तपास सुरू केला.
घटनास्थळावरची परिस्थीती पाहता खुनाची शंका आल्याने पोलिसांनी शांताबाईला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी आपणच खून केल्याची शांताबाईने कबुली दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.