सांगली - महापूर ओसरल्यावर घरी परतणाऱ्या पूरग्रस्तांना आता एका नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. घरात डेरा टाकून बसलेल्या सापांशी पूरग्रस्तांचा सामना होत आहे. गेल्या 4 दिवसात सांगलीसह हरीपूर परिसरात तब्बल 250 हून अधिक साप पकडले आहेत.
सांगलीत महापुरानंतर सापांचा वावर, नागरिकांच्या घरांमध्ये आढळले तब्बल 250 साप
पुरासोबत वाहत आलेल्या सापांनी अनेक घरांमध्ये आसरा घेतला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर घरात घुसलेले साप पकडण्यासाठी सर्पमित्र प्रयत्न करत आहेत.
सांगलीच्या कृष्णा नदीचा महापूर आता ओसरला आहे. पूरग्रस्त आपल्या घरी पोहचत आहेत. पाण्यात बुडालेल्या घरातील घाणीचे साम्राज्य काढणे हे पूरग्रस्तांसमोर आव्हान आहे. मात्र, त्यांना सापांच्या संकटाचाही सामना करावा लागत आहे. पुरासोबत वाहत आलेल्या सापांनी अनेक घरांमध्ये आसरा घेतला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर घरात घुसलेले साप पकडण्यासाठी सर्पमित्र प्रयत्न करत आहेत. सर्पमित्रांनी गेल्या 4 दिवसात तब्बल 250 सापांना पकडून सापांना जंगलात सोडून दिले आहे.
सांगलीमध्ये सध्या दररोज 70 साप पकडून त्यांच्या अधिवासात सोडून देण्यात येत आहेत. या सापांमध्ये घोणस, मण्यार, नाग, अशा विषारी सापांबरोबर बिन विषारी धामण, टस्कर अशा सर्पांचा समावेश आहे. वन संरक्षण कायद्यानुसार सर्प पकडण्याबाबत निर्बंध आहेत. मात्र, माणसांच्या सुरक्षेला जेथे धोका असेल तेथे सर्प मित्रांची मदत वनविभागाच्या परवानगीने घेतली जात आहे.