रत्नागिरी- मराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेश प्रक्रियवर झाला आहे. आर्थिक मागास दुर्बल घटकांचे म्हणजेच ईडब्यूएसचे राज्य सरकारकडून आरक्षण मिळावे ही मागणी आहे. हे आरक्षण दिले असते तर मराठा समाजाची जवळपास ६०० विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिली नसती. आज जे नुकसान झाले, त्याला सरकारची निष्क्रियता आणि सरकारमधील काही मराठा समाजाचे मंत्री यांच्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. ते खेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संघटनेचे सरचिटणीस विक्रांत आंब्रे उपस्थित होते. यावेळी बोलताना मेटे म्हणाले की, सरकारचे जर हे असेच सुरू राहिले, तर शिवसंग्राम न्यायालयात जाईल, असा इशारा मेटे यांनी दिला आहे.
ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ओबीसी आणि मराठा समाजात तेढ कशी निर्माण होईल हे पाहण्याचे काम सत्ताधारी पक्षातले आणि सरकारमधील काही मंत्री करत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी यावेळी केला आहे. जे आऊट लडेटेड झालेले नेते आहेत त्यांना पुढे करून सरकारमधील वड्डेटीवारसारखे माणसे हे काम करतायत असल्याचा थेट आरोप विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
वाढीव वीज बिलांवरून आंदोलन करणार
वाढीव विजेची बिले देवून सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारला, याचा आम्ही निषेध करत असल्याचे मेटे यावेळी म्हणाले. शंभर युनिट वीज आम्ही मोफत देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. ही घोषणा लांबच राहिली मात्र अशा पद्धतीने वाढीव वीजबिले देणे अतिशय चुकीचे आहे. गोरगरिबांनी वीज वापरलीच नाही, त्यांना मात्र भरमसाट बीले, जे मंत्री भरमसाट वीज वापरतात त्यांना वीजबील नाही, हा मात्र दुजाभाव सरकार करत असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी शिवसंग्राम सुद्धा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विनायक मेटे यांनी दिला. तसेच याबाबत दोन दिवसात उर्जा मंत्र्यांशी आमची बैठक असल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली आहे.
सरकार गोंधळलेले
दुसरी लाट येऊ नये, यासाठी सरकाकडून सर्वच जण सूचना करतायत, पण दुसरी बाजू पाहिली तर कोविड केंद्रे सुरू होते, ते बंद करण्याचा सपाटा महाविकास आघाडी सरकारने लावला आहे. दुसरी लाट आली तर फार वाईट अवस्था असेल, असे एकिकडे सांगितले जाते, तर दुसरीकडे कोविड केंद्र बंद करतायत म्हणजे सरकारचे काय चाललेय हेच कळंत नाही. धोरण निश्चित नाही, निर्णय निश्चित नाहीत, त्याच्यावरची अंमलबजावणी नाही. त्यामुळे हे गोंधळलेले सरकार असल्याची टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.