महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 26, 2019, 9:47 AM IST

ETV Bharat / state

मुख्यमंत्री सेनेचाच होणार; पनवेलमध्ये धडक मोर्चामध्ये शिवसैनिकांची घोषणाबाजी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी, या मागणीसाठी काल (सोमवार) संपूर्ण राज्यभर शिवसैनिकांनी तहसील कार्यालयवर धडक मोर्चा काढला होता.

shivsena Agitation in panvel
शिवसेनेचा धडक मोर्चा

पनवेल- अवकाळी पावसामुळे संपूर्ण राज्यासह पनवेलमध्ये देखील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने नष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी काल (सोमवार) संपूर्ण राज्यभर शिवसैनिकांनी तहसील कार्यालयवर धडक मोर्चा काढला होता. पनवेलमध्येही शिवसैनिकांनी काढलेल्या मोर्चामध्ये राज्यात होणाऱ्या सत्तासमीकरणाची ठिणगी दिसून आली.

शिवसेनेचा धडक मोर्चा


सरकारकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार असल्याने शिवसेनेने तुटपुंज्या मदतीवर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. काल (सोमवार) राज्यभर अनेक जिल्ह्यात शिवसैनिक शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. पनवेलमध्येही रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ठाणा नाका ते पनवेल तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना तत्काळ एकरी 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचे वीजबील सरसकट माफ करावे, अतिवृष्टीमुळे शेतीचे शंभर टक्के नुकसान झाल्याने विमा कंपन्यांनी कुठलाही निकष न लावता सरसकट पीकविमा मंजूर करावा, शेतकऱ्याच्या मुलांची शालेय व महाविद्यालयीन फी सरसकट माफ करावी, अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी शासनाकडून मोफत बी-बियाणांचे वाटप करावे आदी मागण्या करण्यात आल्या. यासंदर्भात शासनाने तत्काळ कारवाई करावी, अन्यथा शिवसेनतर्फे आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा ही यावेळी रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी दिला.


सध्या मुंबईत सुरू असलेल्या राजकारणाचे पडसाद पनवेलमध्ये काढण्यात आलेल्या सेनेच्या धडक मोर्चातही दिसून आले. भाजपने महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी तत्त्व, नीतिमत्ता गुंडाळून ठेवली आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला गेले आहेत. त्यांना विधानसभेत बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. मुख्यमंत्री सेनेचाच होणार, अशा घोषणा रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी केली. यावेळी रायगड जिल्हासंघटक रेखा ठाकरे, पनवेल उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील यांसह अनेक पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा - 'त्या' सफाई कामगारांच्या खात्यांची माहिती देण्यास पनवेल पालिकेला सापडेना मुहूर्त

ABOUT THE AUTHOR

...view details