पुणे -बारामती उपविभागामध्ये दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. इंदापूर तालुक्यात काही ठिकाणी पाऊसही होत आहे. या वातावरणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ हवामान रोगांचा प्रादुर्भाव होण्यास पोषक असल्याने रब्बी हंगामातील पिके संकटात सापडली आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन -
पुढील तीन दिवस असे वातावरण कायम राहणार असल्याचे बारामती कृषी विज्ञान केंद्राने सांगितले आहे. सातत्याने होत असलेल्या हवामान बदलाचा परिणाम पिकांवर होत आहे. हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच कांदा पिकावर करपा, गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. भाजीपाला पिकांनाही हवामान त्रासदायक ठरत आहे. एकूणच रब्बी हंगामातील पिकांना सध्याचे हवामान धोकादायक ठरत आहे. या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पिकांची काळजी कशी घ्यावी, कीडरोगांना प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. पिकांच्या वाढीसाठी थंडी गरजेची आहे. ढगाळ वातावरण वाढल्यामुळे थंडी कमी झाली आहे.