पुणे- भाजप नेते गोयल यांनी लिहलेल्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी, या पुस्तकावरून वादाची ठिणगी पडली आहे. यावरून शिवप्रेमींसह राजकारण्यातून नाराजी आणि संतापाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे भोसले यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, उदयनराजे यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. या पुस्तका संदर्भात मी सविस्तर माहिती घेईल, आता मी कोण काय बोलतंय हे पाहतो आहे. त्यानंतर माझी भूमिका माध्यमांसमोर लवकरच मांडणार असल्याचे उदयनराजेंनी स्पष्ट केले आहे.
उदयनराजे पुढे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्वजण वागले तर देशात सध्याची जी काय परिस्थिती आहे. जी अराजकता आहे ती राहणार नाही.
गोयल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर चरित्रात्मक पुस्तक लिहले असून आज के शिवाजी नरेंद्र मोदी असे शिर्षक त्या पुस्तकास देण्यात आले आहे. ते पुस्तक रविवारी दिल्लीत प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर मात्र, मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. समाज माध्यमावरून समाजसेवक, राजकारणी आणि तरुणांईमधून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या पुस्तकावरून शिवेसना खासदार संजय राऊत यांनी देखील शिवरायांचे वशंज असणाऱ्या दोन्ही भाजपमध्ये गेलेल्या राजांना हे मान्य आहे का? त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी प्रतिक्रिया दिली होती. आता उदयनराजेंनी सध्या तरी त्यांची भूमिका मांडण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला आहे. यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंना संजय रौताच्या जिभेला लगाम घालण्याची मागणी व्यक्त करत संताप व्यक्त केला. तसेच त्याची मुजोरी सहन केली जाणार नसल्याचाही इशारा दिला.