पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे 5 ऑगस्ट रोजी पुणे विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचे विमानतळावर स्वागत केले. राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवार हे युती सरकारमध्ये सहभागी झाले. यासर्व घटनाक्रमानंतर पहिल्यांदाच अमित शाह हे महाराष्ट्रात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी फुटीनंतर शाह काय बोलणार याची प्रतिक्षा सर्वांनाच होती.
अजित पवार योग्य ठिकाणी आले - अजित पवार पहिल्यांदाच योग्य जागेवर बसले आहेत. मी अजित पवार पहिल्यांदाच एका मंचावर बसलो आहोत. अजित पवार हे उशिरा का होईना, योग्य ठिकाणी आले आहेत. महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे. सीआरसीएसचे संपूर्ण काम आता पूर्णपणे डिजीटल होणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
शाह यांनी सहकार क्षेत्राला प्रोत्साहन दिले - उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यांचे गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. शाह यांनी सहकार क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. ८० हजार कोटींची राज्यात कामे सुरू आहेत. करमाफीमुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. मोदी व शाह यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती सुरू असल्याचे अर्थमंत्री यांनी म्हटले आहे.
सहकार क्षेत्रात अमित शाहांचे योगदान - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सहकार प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्यासाठी पोर्टल सुरू केले आहे. सहकारातून समृद्धी येऊ शकते हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे. अमित शाह हे कणखर गृहमंत्री आहेत. अमित शाह यांची महाराष्ट्र ही जन्मभूमी तर भारत ही कर्मभूमी आहे. त्यांचा जन्म मुंबईतील आहे. अनेक वर्ष अनेकांना जमू शकले नाही, ते शाह यांनी केले. साखर कारखान्यांची थकबाकी कमी करण्यासाठी अमित शाह यांनी प्रयत्न केले. त्यांनी सहकारी चळवळ मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शाह यांनी महाराष्ट्रात साखर कारखाना सुरू केला होता, अशी आठवणही फडणवीस यांनी सांगितली.