परभणी -दहशतवादी विरोधी पथकाकडून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. त्यासाठी गेल्या ४ महिन्यांपासून सूचना दिल्या जात आहेत. मात्र, काही भंगार विक्रेत्यांनी भंगार मालाच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे अशा ५ भंगार व्यावसायिकांविरोधात 'एटीएस'ने गुन्हे दाखल केले आहेत.
परभणीचे पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाकडून जिल्ह्यातील नेट कॅफे, लॉज, भंगार विक्रेते यांची तपासणी करून त्यांना सुचना देण्यात येत आहेत. जिल्ह्यात राष्ट्र विघातक तसेच सामाज घातक कृत्यांना आळा घालणे, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
जिल्हादंडाधिकारी पी. शिवाशंकर यांनी जिल्ह्यातील घर मालक, भाडेकरू, लॉज मालक, सायबर कॅफे, मोबाईल सिम विक्रेते, भंगार विक्रेते, प्रिटींग प्रेस, ऑफसेट चालक, विस्फोटक गोदाम परवाना धारक यांच्या नियमित तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या सर्व ठिकाणांवर गेल्या ४ महिन्यांपासून वारंवार भेट देऊन एटीएस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांची चमू तपासणीचे काम करत आहे.
भंगार विक्रेत्यांना खरेदी-विक्री केलेल्या भंगार मालाची रजिस्टरमध्ये नोंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, शहरातील ५ विक्रेत्यांनी अशा कुठल्याही नोंदी घेतल्या नाही. त्यामुळे दोन भंगार विक्रेत्यांच्या विरोधात कोतवाली, तर ३ जणांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ताज स्क्रॅप सेंटर, एचकेजीएन स्क्रॅप सेंटर, रियाज स्क्राप सेंटर, बिलाल स्क्रॅप सेंटर आणि बाबा डिस्पोजल स्क्रॅप सेंटरच्या मालकांचा समावेश आहे.
दरम्यान या पाचही विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती एटीएसच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी गंगाखेड येथील अशाच दोन भंगार व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच शहरातील काही नेट कॅफे चालकांवर ही कारवाई करण्यात आली होती.