पालघर :वसई तालुक्यातील सर्व भागात काल मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे थंडीत वसईकरांना पावसाचा अनुभव मिळत आहे. त्यामुळे थंडीत घातल्या जाणाऱ्या स्वेटरऐवजी नागरिकांना घराबाहेर पडताना छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने पुढचे चार दिवस पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार शहरात पावसाच्या सरी बरसत आहेत. ढगाळ वातावरणासह हवेत गारवा वाढला आहे. शहरी व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा फटका आता कोळी बांधवांना बसू लागला आहे. मासे सुकवण्याच्या प्रक्रियेवर पावसाचा परिणाम होऊ लागला आहे. अर्नाळा समुद्रकिनारी सुकण्यासाठी टाकलेल्या बोंबील, जवळा सारख्या सुक्या मासळीवर पावसाचे पाणी पडत असल्याने आता मासळी कुजू लागली आहे.