नाशिक -चांदगिरी गावाजवळील तलावाच्या काठावर गुरुवारी सकाळी नऊच्या दरम्यान कपडे धुण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतलेल्या मैत्रिणीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. आकांक्षा दिलीप बागुल (वय.१७) असे मृत मुलीचे नाव आहे. तर ऋतुजा तानाजी कटाळे (वय.१९) असे पाण्यात बुडताना वाचलेल्या तरुणीचे नाव आहे.
कपडे धुण्यासाठी गेलेल्या तरुणीचा तलावात पडून मृत्यू
चांदगिरी गावाजवळच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची नोंद नाशिक रोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नाशिक तालुक्यातील चांदगिरी येथे गुरुवारी सकाळी नऊच्या दरम्यान आकांक्षा दिलीप बागुल व ऋतुजा तानाजी कटाळे या दोघी गावाजवळील तलावाच्या काठावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आकांक्षाचा पाय घसरुन ती पाण्यात बुडायला लागली. ही बाब ऋतुजाच्या लक्षात आल्यावर तिने आरडाओरडा करत मैत्रिणीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. तिचा आवाज ऐकून तलावाच्या शेजारीच शेतात काम करणाऱ्या भारत राधू कटाळे व राजू थोरात यांनी तलावाकडे धाव घेतली. तेव्हा दोघी पाण्यात बुडत असल्याचे दिसले.
यावेळी दोघांनीही पाण्यात उड्या घेत मुलींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऋृतुजाला बाहेर काढले व थोड्यावेळात आकांक्षालाही पाण्याच्या बाहेर काढले. त्यानंतर गावकऱ्यांनी व पोलीस पाटील लखन कटाळे यांनी तत्काळ उपचारासाठी आकांक्षाला बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ॠतुजा कटाळे हिची तब्येत स्थिर असल्याचे समजते आहे.