नाशिक -नाशिकच्या देवळाली परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका बिबट्याने धुमाकूळ घातला होता. अनेक नागरिकांना या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. अखेर या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
जेरबंद करण्यात आलेल्या या बिबट्याचा गेल्या 10 दिवसांपासून या परिसरात वावर होता. त्याने परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे नागरिक घराच्या बाहेर निघायला देखील घाबरत होते. मात्र बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
निफाड, सिन्नर, इगतपुरी भागात बिबट्याचा वावर
निफाड, सिन्नर, इगतपुरी या तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे लपण्यासाठी जागा मिळते, तसेच या तालुक्यात शेळ्या, मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे बिबट्याला अन्न देखील मिळत असल्यामुळे या परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर असल्याचे पाहायला मिळत होते. वनविभागाच्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात जवळपास 200हून अधिक बिबटे असल्याचे समोर आले आहे.
एक महिन्यात चार बळी
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत असून, इगतपुरी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने एका महिन्यात चार जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, हा बिबट्या पकडण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.