नांदेड - वाशिम जिल्ह्यातील पेनटाकळी धरण शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे इसापूर धरणाच्या पाणी पातळीत अतिशय वेगाने वाढत होत आहे. त्यामुळे सात वर्षानंतर धरण शंभर टक्के भरण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता असून, पैनगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या इसापूर धरणात मोठा पाण्याचा येवा येत आहे. अशाच प्रमाणात येवा येत राहिल्यास येत्या 4 ते 5 दिवसांत इसापूर धरण शंभर टक्के भरेल असा अंदाज आहे. इसापूर धरणातील पाण्याचा विसर्ग पेनगंगा नदीपात्रात सोडल्यामुळे पेनगंगा नदीला पूर येऊ शकतो हे लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग कार्यकारी अभियंता पी.एल. भालेराव यांनी ही माहिती दिली.
2013 मध्ये इसापूर धरणामध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला झाला होता. त्यानंतर काही काळ धरण मृतसाठ्याच्याही खाली गेले होते. गत दोन वर्षात धरणात मुबलक साठा उपलब्ध झाल्यामुळे शेतीला पाणी मिळत होते. पण यंदा आतापर्यंत धरण 79.79 % इतके भरले असून आवकही चांगली सुरू आहे. मात्र, यावर्षीची स्थिती पाहता, तब्बल सात वर्षानंतर धरण शंभर टक्के भरण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता असून, पैनगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून दोन्ही नदीकाठच्या गावातील नागरिकांना आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत संबंधित तहसिलदार, पोलीस विभाग यांना सुचना देण्यात आली आहे. तसेच विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.