नागपूर- राज्यात वेगाने होत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा टाळेबंदी लावण्याची मागणी जोर धरत असताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात आता टाळेबंदी लावली जाणार नसल्याचे ते म्हणाले. टाळेबंदीऐवजी नियम अधिक कडक केले जातील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याशिवाय अनेक विषयांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
राज्यात टाळेबंदी लावणार नाही, निर्बंध आणखी कडक केले जातील - वडेट्टीवार
राज्यात आता टाळेबंदी लावली जाणार नसल्याचे ते म्हणाले. टाळेबंदीऐवजी नियम अधिक कडक केले जातील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याशिवाय अनेक विषयांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले. सध्या उपलब्ध साधनांच्या आधारे कोरोनाच्या परिस्थिती वर मात करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त 65 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत, अधिक निधी लागला तरी आम्ही देऊ अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.
अनिल देशमुख प्रकरणाची चौकशी होऊ द्या
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे गंभीर आरोप केले आहेत, त्यासंदर्भात निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी लावली आहे. चौकशीनंतर सत्य बाहेर येणारच असल्याने त्यानंतर कारवाई संदर्भात निर्णय घेणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाकडून केवळ वावड्या उठवल्या जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. भाजपकडून केवळ आपल्या आमदारांना वाचविण्यासाठी अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जात असल्याचे ते म्हणाले आहेत.
उपनगरीय रेल्वे सेवा बंद होणार नाही
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा उपनगरीय रेल्वे सेवा (लोकल) बंद केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर देखील वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षी लोकल संदर्भात जे नियम लावले होते, तसेच नियम लावले जातील लोकल बंद केली जाणार नाही, मात्र निर्बंध लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.