नागपूर -बेकायदेशीर वाढीव शालेय शुल्क वसूल केल्याप्रकरणी नागपुरातील नारायणा शाळेवर शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. तब्बल ७.५० कोटी रूपये शाळेने पालकांना परत करण्याचे आदेश संबंधित विभागाने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शुल्क आकारणाऱ्या राज्यातील सर्व शाळांवर कडक कारवाई होणार, अशी माहिती मंत्री बच्चू कडू यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तर दुसरीकडे येणाऱ्या २२ डिसेंबर ला कृषी कायद्याचा विरोध म्हणून अंबानीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री बच्चू कडू. इतकी रक्कम वसूल होणार -
वाढीव शालेय शुल्कावरून पालक संघ चांगलेच आक्रमक झाल्याचे काही दिवसापूर्वी पाहायला मिळाले. याची नोंद राज्य शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी घेतली. त्यानंतर शहरातील विविध शाळांच्या चौकशीचे आदेश कडू यांनी दिले. यात शहरातील नारायणा शाळेवर कारवाई करत तब्बल ७.५० कोटी रूपये पालकांना परत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. हे शिक्षण शुल्क अवैधरित्या वसूल करण्यात आल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. याचीच दखल घेत ही कारवाई करण्यात आली.
शाळा कोणाचीही असो... बेकायदेशीर शाळांवर कारवाई होणारच -
यापुढे कोणत्याही शाळेने बेकायदेशीर शुल्क वसूल केले तर कडक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. शिवाय ती शाळा कोणत्याही राजकीय नेत्याची असो वा पक्षाची पालकांवर शुल्कावरुन अन्याय होऊ देणार नाही. राज्यातील पालकांबरोबर बेईमानी कराल तर सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा -'महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही; तर आम्हाला अमेझॉन मान्य नाही', मनसेचा इशारा
इतक्या शाळांवर होणार कारवाई -
येत्या काही दिवसात शहरातील १५ शाळा अजून रडावर असल्याची माहीतीही यावेळी बच्चू कडू यांनी दिली. अशावेळी कायदेशीर बाबींच्या बाहेर गेल्यास कारवाई निश्चितच होणार, असेही त्यांनी सांगितले. तसेच माझ्यावर कोणाचाही दबाव येणे शक्यच नाही. आमच्यावर फक्त जनतेचाच दबाव येतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
'या' तारखेला अंबानीच्या कार्यालयावर मोर्चा...
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्य शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आम्ही येत्या २२ डिसेंबरला अंबानीच्या मुंबई येथील कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. यात विविध सामाजिक व राजकीय नेते मंडळी सहभागी असणार असल्याची माहिती मंत्री बच्चू कडू यांनी दिली.