मुंबई :महाराष्ट्र राज्य कॉपरेटिव्ह शिखर बँक घोटाळा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सुद्धा माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांची चौकशी करण्यात यावी, याकरिता मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे पुन्हा अण्णा हजारे पवार कुटुंब सक्रिय झाले आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात देखील याचिका प्रलंबित आहे.
नव्याने तपास सुरू :महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित 25 हजार कोटींचा घोटाळा प्रकरणाची उद्या मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र, दाखल याचिकेत अण्णा हजारे हे अजित पवार विरोधात न्यायालयात गेले आहे. वरिष्ठ वकील सतीश तळेकर यांच्या माध्यमातून अण्णा हजारे यांनी याचिका दाखल केली आहे. उद्या वकील सतीश तळेकर हे कोर्टात अण्णा हजारे यांच्या वतीने बाजू मांडणार आहे. याप्रकरणी पवारांसह एकूण 75 जणांना दोन वर्षांपूर्वी क्लीन चीट देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी नव्याने तपास सुरू केला आहे.
मिळाली होती क्लीन चीट :शिखर बँकेचे अधिकारी, संचालक तसेच तत्कालीन लोकप्रतिनिधी यांनी राज्य सहकारी बँकेच्या कर्जमंजुरी व कर्जवसुलीत संगनमताने दस्तऐवजांचे बनावटीकरण करून अपहार आणि पदाचा गैरवापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले नाही. तक्रारदार सुरिंदर अरोरा यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे शिखर बँकेने सहकारी संस्थांना मंजूर केलेली कर्ज याविषयीच्या तपासात कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याचे कृत्य आढळलेले नाही. तक्रारदाराने नाबार्डच्या अहवालातील मुद्द्यांच्या आधारे हे आरोप केले आहेत असा निष्कर्ष नोंदवत इओब्ल्यूने दोन वर्षांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयात 'सी-समरी' अहवाल दाखल करून हे प्रकरण बंद करण्याची विनंती केली होती. त्यामुळे सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्यासह या प्रकरणात आरोपी असलेल्या सर्व पक्षीय नेत्यांना दिलासा मिळाला होता.