मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणदेखील होते. तसेच त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वयक्तिक चर्चाही झाली. यासंदर्भात शिवसेनानेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच', असे संजय राऊत यांनी म्हटले.
'ठाकरे आणि मोदींचे जुने संबंध' -
ठाकरे-मोदी भेट होणार म्हणजे चर्चातर होणारच आहे. ही भेट महत्त्वाची आहे. केंद्रासोबत मराठा आरक्षण आणि कांजूर मेट्रो शेडच्या जागेसह विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच दोघांमध्ये अर्धा तास वन-टूवन चर्चाही झाली. यानंतर सुरू झालेल्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'या भेटीचे राजकीय संदर्भ ज्यांना काढायचे आहेत, त्यांनी ते काढावेत, मोदींसोबत जुने संबंध आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हाला नेहमीच त्यांचा आदर आहे. या भेटीमुळे नवीन सत्ता समीकारणांचा इथे विषय नाही. आमचा संघर्ष कायम नाही. केव्हा तरी त्याला पूर्णविराम द्यावा लागेल', असेही ते म्हणाले.