महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांचे बळी घ्या, असे राज्यघटनेत लिहलेय का?

वृत्तपत्र वितरणाच्या बंदीवरील मुख्य कारण सामनात मांडण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना वृत्तपत्र वाटप करणारी मुले कशी सुरक्षित राहतील, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

By

Published : Apr 20, 2020, 12:19 PM IST

samanaa todays editorial about newspaper printing and distribution
सामना- आजचा अग्रलेख

मुंबई - ठाकरे सरकारने वृत्तपत्राच्या छपाईला परवानगी दिली आहे. मात्र, त्याच्या वितरणावर निर्बंध घातले आहे. सरकारच्या या निर्णयावर मात्र टीका होताना दिसत आहे. हा प्रकार वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला असून सरकारविरोधी आंदोलने करण्याची भूमिका काही पत्रकार संघटनांनी घेतली आहे. यावर संपूर्ण प्रकारावर आजच्या सामनातून सडकून टीका करण्यात आली आहे.

वृत्तपत्र छपाईला परवानगी, पण वितरणाला बंदी हा ठाकरे सरकारचा अजब फतवा असल्याची टीका सुरू झाली आहे. हा प्रकार म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला वगैरे असून या तुघलकी आदेशाविरुद्ध निषेध-आंदोलने करण्याची फर्माने काही पत्रकार संघटनांनी सोडली आहेत. राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनीदेखील या आदेशाचा फेरविचार करावा व हे आदेश म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकरांच्या राज्यघटनेचा संदर्भ देण्यात आला आहे. पण डॉ. आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांच्या जिवाशी, आरोग्याशी खेळा, लोकांचे बळी घ्या असेही कोठे घटनेच्या कलमातलिहून ठेवल्याचे सापडत नसल्याचेही सामानातून स्पष्ट केले आहे.

वृत्तपत्र वितरणाच्या बंदीवरील मुख्य कारण सामनात मांडण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना वृत्तपत्र वाटप करणारी मुले कशी सुरक्षित राहतील, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शिवाय मोठमोठ्या शहरातील अनेक सोसायट्यांनी वृत्तपत्रे टाकणाऱ्या मुलांना प्रवेश निषेध केला आहे. मग ती वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रश्नच उरत नाही. अशा परिस्थितीत वृत्तपत्रांचे बडे भांडवलदार मालक पुढे येऊन वर्तमानपत्र घरोघरी टाकणाऱ्या पोरांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरुपी निधी उभा करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत का? असा सवालदेखील उपस्थित केला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस यांनीही वृत्तपत्र वितरणावरील बंदी हटवण्याची मागणी केली होती. त्यांनाही सामनातून टोला लगावण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंना तुम्ही सल्ला देऊ नका, त्यांना त्यांचे काम करू द्या. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने वृत्तपत्र सुरक्षित असल्याचे सांगितले असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते, त्यावरूनही त्यांना श्रीमान फडणवीस डॉक्टर कधीपासून झाले, असा टोला लगावला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे मोदींचे मित्र असून त्यांनी जागतिक आरोग्य संघटना ही बकवास आणि खोटारडी असल्याचे मत व्यक्त केले. 'ट्रम्प बोले, मोदी डोले' असे असताना फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना शिकवू नये, असा सल्ला सामनातून त्यांना देण्यात आला आहे.

इटली, स्पेन, युरोपात वृत्तपत्रांवर बंदी नव्हती, तिथे सर्वात जास्त हाहाकार झाला. इटलीसारख्या देशात वर्तमानपत्र हातात पकडायला पुढची पिढी असेल की नाही, याची भिती आहे. तर, ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाली. वृत्तपत्राचे स्वातंत्र्य अबाधित असताना त्यांना विजनवासात जावे लागले, असेही सामनात नमुद केले आहे. दरम्यान, वृत्तपत्रांचे वितरण सुरळीत व्हावे, टिळक, आगरकर अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांचे शस्त्र तेजाने तळपत राहावे, ते शस्त्र कोणालाही मोडता येणार नाही, बोथट होणार नाही, यासाठी वृत्तपत्र छापत राहू, अशी भूमिका सामनातून स्पष्ट करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details