मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगारीचा प्रश्न आणि त्यांच्या असलेल्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, अन्यथा आम्ही विरोधी पक्ष म्हणून टोकाची भूमिका घेत कर्मचाऱ्यांनी न्याय मिळवून देऊ, असा इशारा विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
प्रवीण दरेकर- विरोधी पक्ष नेते महानगरपालिका, बेस्टमधील कर्मचार्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे रुपये 15 हजार 500 व 10 हजार 100 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे. परंतु एसटी कर्मचारी राज्यभर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत असूनही त्यांना ऑगस्ट 2020 पासून तीन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष वाढला असून प्रलंबित वेतन आणि इतर आर्थिक लाभ मिळण्यासाठी आजपासून ते राहत्या घरी कुटुंबासह आक्रोश व्यक्त करत आहेत, यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही टोकाची भूमिका घेऊ असा इशारा दिला आहे.या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-एसटी कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दोन दिवसात एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी पगार मिळत नसल्यामुळे आत्महत्या करण्यासारखे टोकोचे पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. तरीही हे ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या ठाकरे सरकारवर ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आग्रही मागणी करतानाच कर्मचाऱ्यांचे थकित पगार दिवाळपूर्वी द्या, अन्यथा भाजपाच्यावतीने टोकाची भूमिका घेण्यात येईल, असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.