महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा नाही; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

आघाडीमध्ये राष्ट्रवादीला किती जागा मिळाव्यात याबाबत कसलीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.

By

Published : Jun 13, 2019, 7:33 PM IST

बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा नाही; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आढावा घेतला जात आहे. उमेदवार कसे ठरवायचे कोणत्या जागांवर लढवणे आवश्यक आहे, यावर चर्चा सुरू आहेत. मात्र, आघाडीमध्ये राष्ट्रवादीला किती जागा मिळाव्यात याबाबत कसलीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.

बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा नाही; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

मुंबईतील बॅलार्ड पियर येथे असलेल्या राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयात आज सकाळपासून कोकणातील सिंधुदुर्गपासून ते पालघर आणि मुंबईपर्यंतच्या विधानसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक पार पडली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, विधानसभेची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विभागनिहाय कार्यकर्ते बोलवले होते. यासाठी 5 दिवसात राज्यातील वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते बोलवण्याचे ठरलेले आहे. त्याप्रमाणे आज सिंधुदुर्गपासून पालघर, मुंबईपर्यंतच्या विभागांचा आढावा घेण्यात आला. आज पहिला दिवस झाला. तर उद्या (गुरुवारी) उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील विभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यांचा आढावा घेतला जाईल. तर पुढच्या आठवड्यात 21 आणि 23 जूनला इतर जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे, त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या समावेश असेल.

बारामतीच्या पाण्यासंदर्भात सरकार अन्यायाची भूमिका घेत आहे-

यापूर्वी बारामतीच्या पाण्यासंदर्भात आमच्या सरकारने जे निर्णय घेतले होते ते योग्य होते, सर्वांना न्याय देणारे होते. कोणत्याही भागावर अन्याय करण्याची त्या निर्णयात भूमिका नव्हती. मात्र, आताचे सरकार अन्यायाची भूमिका घेत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला काही ठिकाणी मताधिक्य मिळाले आहे. तर काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाला मिळाले आहे. त्याबद्दल कार्यकर्त्यांनी आज चिंता व्यक्त केली. बहुतेक कार्यकर्त्यांनी परिस्थिती चांगली असतानाही मते आपल्याला कमी का मिळाली? याविषयी अनेक प्रकारच्या शंका आजच्या बैठकीत उपस्थित केल्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत पुन्हा नव्या जोमाने लढण्यासाठीची तयारी करण्यासाठी सर्वांचे एकमत झाले आहे. तरीही एवढा मोठा पक्ष असल्याने काही ठिकाणी कार्यकर्त्यांची तुरळक नाराजी असेल. परंतु, तो विषय आजच्या बैठकीत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

शिवसेना आणि भाजपमध्ये उपमुख्यमंत्री कोण व्हावा, यावरून रस्सीखेच सुरू आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, यासाठी काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details