मुंबई -विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघातून आपल्या दोन उमेदवारांची नावे आज घोषित केली आहेत. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी भाजपला तगडे आव्हान देणार आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीने पुन्हा एकदा विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर पुण्यातून उद्योगपती अरुण लाड यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ मागील काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने आपल्याकडे राखून ठेवला आहे. यावेळीही विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनाच राष्ट्रवादीने संधी दिली आहे. तर भाजपकडून यावेळी औरंगाबादेतून शिरीष बोरालकर यांना मैदानात उतरवले आहे. औरंगाबाद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात मागील अनेक निवडणुकांमध्ये भाजपला अंतर्गत विरोधामुळे अपयशाला सामोरे जावे लागते. यावेळी भाजपने बोरकर यांना उमेदवारी दिली असली तरी भाजप पुरस्कृत असलेल्या अनेक प्राध्यापक संघटनांची त्यावर नाराजी आहे. विशेष म्हणजे भाजपचा कणा असलेल्या शिक्षक परिषदेमध्येही दुफळी निर्माण झाली असल्याने भाजपला याचा फटका बसणार आहे.
हेही वाचा -...तर मी भाजपमध्ये प्रवेश करणार, नगरमध्ये मंत्री बच्चू कडूंचे खळबळजनक वक्तव्य