मुंबई- राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज शनिवारी (दि.20) महाराष्ट्रात 6281 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संक्रमण वाढत असून मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आज 40 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 51 हजार 753 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.16 टक्के तर मृत्यूदर 2.47 टक्के झाला आहे. विदर्भातील स्थिती अधिकच चिंताजनक बनली असून आज एकट्या अमरावती जिल्ह्यात 1058 रुग्ण सापडले आहेत. ही वाढ मुंबई, पुणे या शहरांपेक्षा मोठी असल्याने अमरावतीकरांसाठी चिंतेची बाब आहे.
रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार - मंत्री विजय वडेट्टीवार
14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663, 17 फेब्रुवारीला 4787, 18 फेब्रुवारीला 5427, 19 फेब्रुवारीला 6112 तर आज 6281 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसात रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काही शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार आहे. मात्र, त्याबद्दल स्थानिक प्रशासनाला निर्णय घ्यायचे आहेत. जिल्हाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी परिस्थितीनुसार तो निर्णय घ्यावा, असे निर्देश सरकारने दिले आहेत, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सांगितले.
आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. प्रशासनाकडून कोरोना नियम काटेकोर पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर यासह काही शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. याबाबत बरेच तर्क-वितर्क आहेत. नवीन कोरोना प्रकार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. नागरिक तोंडाला न बांधता फिरत आहेत. या परिस्थितीत सरकारला कठोर पावले उचलावी लागतील, असे आज मंत्री विजय वडेट्टीवार नागपुरात म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाकाबंदी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक प्रशासनाकडून पुन्हा एकदा तपासणी नाका सुरू करण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने कर्नाटक सरकारकडून तपासणी नाका उभारण्यात आला आहेत. केंद्र सरकारचे याबाबतचे कोणतेही आदेश नसताना महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रत्येक गाडीची आजपासून तपासणी सुरू झाली आहे. येथील दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या कोगनोळी पथकर नाका येथे ही तपासणी सुरू करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात केले आहेत.