मुंबई - जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला असताना महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे बंदी घातलेल्या देशातील लोक दुसऱ्या देशांच्या मार्गे महाराष्ट्रात येत आहेत, असा धक्कादायक खुलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला. तर गुरुवारी दुपारपर्यंत हा आकडा 47 इतका होता. त्यात दोन रुग्णांची भर पडली आहे. यात एक रुग्ण लंडनवरून आलेला आहे. तर दुसरा दुबईहून घरी परतला आहे.
वाढलेल्या आकड्यांविषयी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. कोरोनामुळे बंदी घातलेल्या देशातील लोक दुसऱ्या देशांच्या मार्गे महाराष्ट्रात येत असल्याचे ते म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती दिली. 'राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 49 वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र, आता ही संख्या वाढली आहे. यातील 40 जण बाहेरच्या देशांमधून आलेले आहेत, असेही मंत्री त्यांनी सांगितले. यातील मुंबईतील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.