मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात 25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661 रुग्ण आढळुन आले आहेत. आज त्यात किंचित वाढ होऊन 892 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 16 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 1063 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.6 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
- 14,526 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 892 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 17 हजार 654 वर पोहचला आहे. तर आज 16 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 388 वर पोहोचला आहे. आज 1063 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 59 हजार 108 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.6 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 32 लाख 40 हजार 769 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.46 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 48 हजार 743 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 14 हजार 526 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.