महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 1, 2019, 6:34 PM IST

ETV Bharat / state

काँग्रेसच्या अमीन पटेल यांच्या विरोधात माजी पोलीस अधिकारी निवडणूक रिंगणात

एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला असलेला मुंबादेवी मतदार संघातून मागच्या दोन वेळी काँग्रेसचे अमीन पटेल आमदार म्हणून निवडून आले. यंदा या मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीने माजी सहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण हा तगडा उमेदवरा दिला आहे.

माजी सहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण

मुंबई- एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मुंबादेवी मतदार संघामधून काँग्रेसचे अमीन पटेल दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अमीन पटेल यांना तिसऱ्यांदा काँग्रेसकडून उमेदवारी दिली आहे. मात्र, यावेळी अमीन पटेल यांना ही निवडणूक सोपी नसणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून माजी सहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण हे निवडणूक लढवत आहेत.

बोलताना समशेर खान पठाण


अमीन पटेल यांना वंचित बहुजन आघाडीच्या या तगड्या उमेदवाराला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे या मतदार संघात अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील बेकायदेशीर बांधकामे, स्वच्छ पाणी, ट्रॅफिक, ड्रग माफिया आदी प्रश्नावर आपण निवडणूक लढवणार असल्याचे पठाण यांनी संगितले.

हेही वाचा - मागाठाणेतील शिवसेना भाजपचे अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

मुंबादेवी मतदार संघातून १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे राज पुरोहित हे अमराठी मतांच्या पाठिंब्यावर आमदार म्हणून निवडून आले होते. विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना झाली होती. त्यात मुंबादेवी मतदार संघाचा विस्तार होऊन डोंगरी, सॅण्डहर्स्ट रोड आदी मुस्लीमबहुल भाग या मतदारसंघांत समाविष्ट झाला आणि या मतदारसंघातील समीकरणे बदलली. त्यामुळे २००९ मध्ये हा मतदारसंघ भाजपने शिवसेनेला दिला. शिवसेनेने माजी आमदार चंद्रकांत पडवळ यांचे पुत्र अनिल पडवळ यांना या मतदारसंघातून रिंगणात उतरविले. मुस्लीम मतांच्या जोरावर काँग्रेसचे अमिन पटेल विजयी झाले. २०१४ मध्ये शिवसेना-भाजपची युती तुटली. दोन्ही पक्षात मतांच्या झालेल्या विभाजनामुळे भाजपच्या अतुल शाह यांचा पराभव करत पुन्हा अमिन पटेल विजयी झाले. एकेकाळी भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपच्या अतुल शाह यांना पराभव पत्करावा लागला होता.

हेही वाचा - भाजपमध्ये दाखल झालेल्या 'या' आयारामांना मिळाली संधी

आमदार म्हणून दोन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे अमीन पटेल तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. अमीन पटेल यांनी गेल्या दहा वर्षात मतदार संघामधील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या विरोधात लाट आहे. पटेल यांच्या कार्यकाळात मतदार संघात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. गेल्या दोन वर्षांत चार इमारती कोसळल्या आहेत. मलनिःस्सारण आणि पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या फुटल्याने त्यामधून नागरिकांना गढूळ पाणी मिळत आहे. पुनर्विकास झालेल्या इमारतींमध्ये पार्किंगच्या जागा आहेत. मात्र, त्यात पार्किंग केले जात नसल्याने रस्त्यावर ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच ड्रॅग माफियांमुळे तरुण पिढी वाया जात आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहे. मी, एक शिस्तबद्ध पोलीस अधिकारी असल्याने मतदार नागरिकांकडून मला पाठिंबा मिळत आहे. मी मुंबादेवी मतदार संघातून निवडून आलो तर सहा महिन्यात या समस्या सोडवू असे, पठाण म्हणाले.

या आहेत मतदारसंघातील समस्या

  • दाटीवाटीने उभ्या जीर्ण चाळींचा पुनर्विकास
  • चाळींदरम्यानच्या घरगल्ल्यांमधील कचऱ्याचा प्रश्न
  • अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा
  • सोनारांच्या पेढय़ांचा प्रश्न ऐरणीवर
  • अरुंद गल्ल्या, लहान रस्त्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा

- २०१४ मध्ये झालेले मतदान -

  • अमिन पटेल, काँग्रेस ३९ हजार १८८ (विजयी)
  • अतुल शहा, भाजप ३० हजार ६७५

ABOUT THE AUTHOR

...view details