मुंबई -सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणी दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पण, या प्रकरणात राजकारण अधिक होत असल्याचा दावा काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नसीम खान यांनी आज (19 ऑगस्ट) मंत्रालयात बोलताना केला.
सुशांतसिंह प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, हे करत असताना मुंबई पोलिसांच्या कामकाजावर कुठलीही शंका घेणे किंवा दिरंगाईचा आरोप करणे हे योग्य नाही. जगात स्कॉटलंडनंतर मुंबई पोलिसांचा क्रमांक लागतो. केवळ सुशांतसिंह प्रकरणातच त्यांच्याकडून दिरंगाई झाली, असा आरोप जाणीवपूर्वक विरोधकांकडून केला जात होता. म्हणूनच हे प्रकरण गरज नसतानाही न्यायालयात पोहोचले. त्यावर आज न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयला दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
'सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचे राजकारण अधिक होतंय'
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सतत मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित करणे. सतत विरोधी पक्षाकडून विविध आरोप करणे हे केवळ राजकारण असल्याचा दावा काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नसीम खान यांनी केला.
माजी मंत्री नसीम खान
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज (19 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी या प्रकरणाचा तपास सीबीआय करेल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले. यावर नसीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा -अनिल देशमुख यांचा सावध पवित्रा; म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणावर अभ्यास करून बोलणार