मुंबई- महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत दि. 31 मार्चपर्यंत राज्यातील 18 लाख 89 हजार 528 शेतकऱ्याच्या खात्यात एकूण 11 हजार 966.21 कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यातल आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत दिली आहे.
जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून 10 लाख 40 हजार 935 शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार 407.13 कोटींची तर व्यापारी बँकांच्या माध्यमातून 8 लाख 48 हजार 593 शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार 559.80 कोटी रूपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.
दुग्धउत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा
कोरोनामुळे दुधाचे दर घसरल्याने दुग्धउत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. दुधाचे दर 15 ते 17 रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. यामुळे राज्य सरकार दररोज 10 लाख लिटर दुधाची 25 रूपये प्रतिलिटर दराने खेरदी करण्यात येईल, अशीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ही योजना राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून यासाठी साधरण 200 कोटीच्या निधीची गरज लागणार आहे. संकलित दुधाची भूकटी करून ती साठवली जाणार असून नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, अशीही माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
हेही वाचा -#COVID19 : दुधाची विक्री पाण्याच्या दरात, शेतकरी हवालदील