महाराष्ट्र

maharashtra

रेड झोनमधून भाडं.. नको रे बाबा..! लॉकडाऊनमध्ये वाहनचालकांची तारेवरची कसरत..

By

Published : May 20, 2020, 6:09 PM IST

Updated : May 20, 2020, 7:44 PM IST

मुंबई शहर सुरुवातीपासून रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे वाहतुकीचे निर्बंध अत्यंत कठीण... त्यात कोरोनाची भीती... त्यामुळे अनेकांनी घरीच बसणे पसंत केले. अनेक वाहनचालकांनी अत्यावश्यक सेवेत उडी घेतली. कुणी भाजीविक्री करू लागले तर, कोणी फळविक्री. तुलनेत ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील वाहनचालकांना थोडासा दिलासा मिळाला. त्यामुळे ऑनलाइन पास काढून अत्यावश्यक सेवेसाठी गाड्या सुरू झाल्या.

रेड झोन मधून भाडं.. नको रे बाबा..
रेड झोन मधून भाडं.. नको रे बाबा..

मुंबई - 'धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय..' काय करू सांगा? घर चालवायचंय, गाडीचे हप्ते भरायचेत, पास काढून भाडी वाहतोय सध्या. पण मनात धाकधुक आहेच. गाडीत बसलेला प्रवासी कोरोना संसर्गित तर नाही ना? अनेक ठिकाणी पोलिसांचे चेक नाके.. हातात ग्लोज घातले. टोलनाक्यावर नेमके सुट्टे पैसे काढून ठेवतो. टोल नाक्याच्या पावत्या काम झाल्यावर जवळ न ठेवता टाकून देतोय. काळजावर दगड ठेवून काम सुरू आहे... ही भयग्रस्त मनाची परिस्थिती व्यक्त केलीय वाहनचालक दशरथ माळी यांनी.. 'ईटीव्ही भारत'ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात भयमिश्रित काळजी स्पष्ट दिसून येत होती.

रेड झोनमधून भाडं.. नको रे बाबा..!

ग्रामीण भागातील तरुणांसाठी वाहनचालकाचा व्यवसाय म्हणजे हुकमी स्वयंरोजगाराचा मार्ग असे सूत्रच झालेय. अलीकडे ओला-उबेरच्या ॲग्रीगेटर मॉडेलमुळे या स्वयंरोजगाराला पालवी फुटली होती. जीवघेण्या स्पर्धेच्या युगात कष्टाला पर्याय नव्हता. कर्जपाणी करून गाड्या घेतल्या काहींनी मालकांच्या गाड्या घेऊन फक्त चालक होणेच पसंद केले... कित्येकांच्या संसाराचा गाडा या रस्त्यावर धावणाऱ्या चाकांवरून सुरळीत चालू होता, अचानक 22 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन घोषित झाला अन् सर्व वाहनचालक जागच्या जागेवर ब्रेक लावल्यासारखे घरीच थांबले...

रोजगाराचं धावतं चलन एकाएकी बंद झालं. मुंबई शहर सुरुवातीपासून रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे वाहतुकीचे निर्बंध अत्यंत कठीण. त्यात कोरोनाची भीती त्यामुळे अनेकांनी घरीच बसणं पसंत केलं. अनेक वाहनचालकांनी अत्यावश्यक सेवेत उडी घेतली. कुणी भाजीविक्री करू लागलं तर, कोणी फळविक्री. तुलनेत ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील वाहनचालकांना थोडासा दिलासा मिळाला. त्यामुळे ऑनलाईन पास काढून अत्यावश्यक सेवेसाठी गाड्या सुरू झाल्या.

अशाच प्रकारे ऑरेंज झोन असेलेल्या रायगड जिल्ह्यातील नेरळस्थित वाहनचालक दशरथ माळी म्हणतो, साहेब गाडी उभी कशी करायची ते सांगा. कर्जाचे मीटर सुरू आहे. घरच्या गरजा देखील संपत नाहीत. अलीकडे सरकारने ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये प्रवासाची परवानगी दिल्यानंतर वाहतूक सुरू केली, तेव्हा कुठेतरी भाडी मिळू लागली. त्यासाठी पहाटे लवकर गाडी काढतो, पाचशे-सहाशे किलोमीटरचा प्रवास करून रात्री पुन्हा घराकडे परत येत असल्याचे त्याने सांगितले.

भाडे करायचे म्हणजे तारेवरची कसरत आहे, असे सांगून तो म्हणाला, प्रवासाला निघतानाच खाण्याच्या वस्तू सोबत घ्यायच्या, मधे कुठे थांबायचं नाही, कमीतकमी स्पर्श आणि संसर्ग होईल, याची पुरेपूर काळजी घ्यायची. वाटेत अनेक ठिकाणी चेकपोस्ट येताच पोटात गोळा येतो. तपासणी करून टोलनाक्यावर आल्यावर नेमके टोलचे पैसे काढून ठेवतो. त्यामुळे सुटे पैसे घेण्याचा प्रश्नच राहात नाही. हातात ग्लोज असतो. पावत्या कोरोना संसर्गित असेल काय अशी शंका मनात येते. मग टोल नाका क्रॉस केल्यावर पावत्या फेकून देतो. सध्या तर सेफ झोनमध्ये आहे.. मात्र मुंबईतला रेड झोन नकोरे बाबा, असे सांगत माळीने आपल्या तोंडावर मास्क चढवला आणि आपल्या पुढच्या कामाला मार्गस्थ झाला...

कोरोनाच्या या परिस्थितीत हा चालक- वाहक आत्मनिर्भर होणार कसा?

सध्याची परिस्थितीत कोण अडचणीत नसणार? असा प्रश्न निर्माण होतोय. टॅक्सीचालक, रिक्षाचालक शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा बाळगून आहेत. राज्यात आणि देशात असे लाखो वाहक जीव धोक्यात घालून कष्ट करत पोटाची खळगी भरत आहे. मात्र, कोरोनाची परिस्थितीत अशीच राहिली तर हा चालकवर्ग आत्मनिर्भर होणार कसा? शासन त्यांना काय मदत करणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

Last Updated : May 20, 2020, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details