मुंबई - मुंबईत गेल्या १० वर्षांच्या कालावधीत डासांच्या उत्पत्तीचे प्रमाण कमी करण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात मलेरियामुळे एकाचाही मृत्यू झाला नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेकडून आरोग्य विभागावर हजारो करोडो रुपयांचा खर्च केला जात असला तरी, पालिकेला दिवसाला केवळ १७ उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यात यश आल्याची आकडेवारी पालिकेकडून देण्यात आली आहे. यामुळे पालिकेच्या डास उत्पत्तीस्थानावरील कारवाईबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबईत सन २०१० मध्ये मलेरियाने थैमान घातले होते. त्यावेळी मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे ७६ हजार ७५५ मलेरियाच्या रुग्णांची नोंद झाली. इतक्या मोठ्या प्रमाणावर आजार फैलावल्याने मुंबई महापालिका प्रशासन चिंतेत पडले होते. रुग्णांवर युद्धपातळीवर उपाय करता यावेत म्हणून महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील ४५ टक्के खाटा राखीव ठेवल्या होत्या. तरीही त्यावर्षी १४५ रुग्ण मृत्यू पावले होते. त्यानंतर महापालिकेने 'मलेरिया' विरोधातील लढाई अधिक तीव्र केली. मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी डास नियंत्रण, त्वरित निदान, अचूक व पूर्ण उपचार, सूक्ष्म आराखडा व रेखांकन, महानगरपालिका अंतर्गत व बाह्य विभागांशी समन्वय, जनजागृती व प्रशिक्षण या ‘मुंबई मंत्र’ हा पाचसूत्री कार्यक्रम राबविण्यात आला. तेव्हापासून मलेरियाविरोधातील लढाई अद्यापही चालू असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
हेही वाचा - 'बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा'