मुंबई: मुंबईत सुमारे ३० लाख वाहने आहेत. रस्त्यावर कशीही वाहने उभी करणे, वापरात नसलेली, ना दुरुस्त असलेली वाहने रस्त्यावर उभी करणे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या आहे. ट्रॅफिकला कारण ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाल्याने वाहनांवर होणारी कारवाई थांबवण्यात आली होती. कोरोना आटोक्यात आल्यावर ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
५५५० वाहनांवर कारवाई : मुंबईत रस्त्यावर वापरात नसलेल्या व भंगार झालेल्या ९४८५ वाहनांना पालिकेने नोटिस बजावली होती. त्यापैकी ३६८५ वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली आहेत. २४० वाहनांच्या मालकांनी दंड भरल्याने ही वाहने पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. तर ५५५० वाहनांवर पालिकेने कारवाई केली आहे. यामधील ७० टक्के वाहने ही दुचाकी आहेत. या वाहनांचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
काय केली जाते कारवाई : रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर पालिका नोटिस लावते. त्यानंतरही ही वाहने रस्त्यावरून हटवली नाही तर पालिका अशी वाहने उचलून नेते. या वाहनांच्या मालकांनी वाहने दंड भरून सोडवली नसल्यास त्या वाहनांचा नंतर लिलाव केला जातो. पालिकेच्या २४ विभाग कार्यालयाच्या हद्दीत ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने बेवारस व भंगार वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम लवकरच सुरू केली जाणार आहे अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
बेवारस वाहनांवर पोलिसांची कारवाई: याआधीही अशी कारवाई करण्यात आली होती. मानखुर्दमध्ये रस्त्याच्या कडेला बेवारस आणि भंगार वाहनांमुळे नागरिकांना चालण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. त्याच बरोबर सर्व ठिकाणी मेट्रोचे काम चालू असल्यामुळे वाहतूककोंडी आणि स्थानिक लोकांसाठी पार्किंगची समस्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून भंगार आणि बेवारस वाहनांवर पोलिसांनी कारवाई करणे सुरू केले आहे.
हेही वाचा: राज्य महामार्गावर गर्डर उभारणीमुळे विशेष ट्रॅफिक ब्लॉक ठाणे शहरालगत उभारणार उन्नत मार्ग