मुंबई- विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांवरून राज्यातील महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या विषयासंबंधी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे भेट घेणार आहेत. या भेटीत काँग्रेसला हव्या असलेल्या चार जागांचा तिढा सुटेल का? हा प्रश्न सद्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
राज्यपाल नियुक्तीच्या आठ जागांची मुदत ही ६ जून रोजी संपलेली आहे. तर उर्वरित ४ जागांची मुदत ही मंगळवारी १६ जून रोजी संपणार आहे. यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीत सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी चार प्रमाणे समान जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. मात्र सेनेकडून संख्याबळ लक्षात घेऊन पाच जागा तर राष्ट्रवादीला चार आणि काँग्रेसला तीन जागा देण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.
मागील महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुकीत काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदत केली होती. तर राज्यसभेच्या निवडणुकीतही काँग्रसने एक पाऊल मागे घेतले होते. त्यामुळे राज्यपाल नियुक्त उमेदवारांमध्ये काँग्रेसला चार जागा हव्या असून त्यासाठी काँग्रेस आता एक पाऊलही मागे घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेसचे दोन नेते मुख्यमंत्र्यांना भेटून आपले नाराजी व्यक्त करणार आहेत.