महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिढा जालना मतदारसंघाचा : अर्जून खोतकर 'मातोश्री'वर दाखल, दानवे-खोतकर होणार दिलजमाई ?

जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राज्यमंत्री अर्जून खोतकर अनेक दिवसांपासून दंड थोपटून तयार आहेत.

By

Published : Mar 16, 2019, 3:12 PM IST

अर्जून खोतकर

मुंबई - शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली आहे. दोन्ही पक्षात जागावाटप निश्चित झाले आहे. पण, जालना मतदारसंघात उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नाही. शिवसेना नेते अर्जून खोतकर हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा भाजपला सुटल्याने ते नाराज आहेत. हा तिढा सोडविण्यासाठी खोतकरांना उध्दव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवले आहे.

अर्जून खोतकर

जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राज्यमंत्री अर्जून खोतकर अनेक दिवसांपासून दंड थोपटून तयार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा चंग त्यांनी बांधला होता. पण, अचानक राजकीय वारे फिरले. भाजप शिवसेनेत युतीची घोषणा झाली. ही जागा भाजपला सुटली. तरीही खोतकर निवडणूक लढण्यासाठी अडून बसले आहेत.

काही दिवसांपूर्वी दानवे यांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. पण, खोतकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चेलाही अधूनमधून तोंड फुटत असते. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी खोतकर काँग्रेसला मदत करतील असे वक्तव्य केले होते. त्यामुळे खोतकरांच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे

आज उद्धव ठाकरे यांनी खोतकरांना चर्चेसाठी बोलावले आहे. मराठवाडा समन्वयक म्हणून पंकजा मुंडे देखील उपस्थित आहेत. या चर्चेतून काही तोडगा निघेल का यावर विशेषतः जालना मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. खोतकरांचे बंड शमविण्यात शिवसेना यशस्वी नाही झाली तर जालन्यात युतीच्या जागेला नुकसान पोहोचू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details