लातूर - जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी पातळी वाढली असल्याचा दावा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. मात्र, या आता जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत निलंगा तालुका अव्वल स्थानी आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या लातूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे २.९९ मिटरने पाणीपातळी घटलेली आहे.
लातूर जिल्हा आणि दुष्काळ हे समीकरणच ठरलेले आहे. यावर्षीही याची दाहकता जाणवू लागली आहे. पाण्यासाठी नागरिकांसह जनावरांची भटकंती सुरू आहे. जिल्ह्यात ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियानाची कामे झाले आहेत. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याचा दावा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निवडणुकीवेळी केला होता. शिवाय टँकरचीही गरज भासणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांच्याच तालुक्यातील जवळपास ४९ गावांमध्ये अतिशय भीषण परिस्थिती असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून समोर आले आहे.