महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नैसर्गिक संकटानंतर शेतकऱ्यांसमोर सुलतानी संकट; अधिकाऱ्यांच्या उदासीनतेवर शेतकरी नाराज

गेल्या काही दिवसापासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. यामुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लोक प्रतिनिधींनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली मात्र, कृषी व विमा कंपन्यांतील अधिकारी शेतकऱ्यांची कामे करण्याबाबत उदासीनता दाखवत आहेत.

By

Published : Sep 29, 2020, 3:46 PM IST

crop
पीक

लातूर - निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील पिके सध्या पाण्यात आहेत. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. कृषी विभागाला शेतीचे पंचनामे करण्याचे आदेशही दिले तरीही शेतकऱ्यांची फरफट सुरूच आहे. पीक विमा भरून घेण्याच्या सूचना असतानाही उदगीर तालुका कृषी कार्यालयात मनमानी कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जात आहेत परंतु, त्याची पोहच दिली जात नाही.

अधिकाऱ्यांच्या उदासीनतेवर शेतकरी नाराज

सततच्या पावसाने खरिपातील सोयाबीन, उडीद, तूर, मूग पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतातून बाहेर येण्याअगोदर आमदार, खासदारांनी पिकांची पाहणी केली. कृषिमंत्री दादा भुसे यांनी देखील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामेकरून ज्या शेतकऱ्यांनी विम्यासाठी ऑनलाइन अर्ज केलेले नाहीत त्यांचे ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याच्या सूचना विम्या कंपन्या आणि कृषी विभागाला भुसे यांनी दिल्या. मात्र, मंत्र्यांच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांची परवड सुरूच आहे. उदगीर तालुका कृषी कार्यालयात विम्याचे अर्ज दाखल करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

तालुका कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे कर्मचारी हे अर्धवट माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. अर्ज स्विकारले जात आहे मात्र, कार्यालयाकडे अर्ज दाखल केले यासाठी आवश्यक असलेली पोहच पावती शेतकऱ्यांना दिली जात नाही. त्यामुळे मदत मिळाली नाही तर जाब कुणाला विचारायचा? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. शेतकरी नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता पहायला मिळत आहे. आमदार आणि कृषीमंत्र्यांसमोर प्रत्येक गोष्टीचे आश्वासन देणारे अधिकारी प्रत्यक्ष काम करताना शेतकऱ्यांना जेरीस आणत आहेत.

ज्याप्रमाणे पीक पाहणीत तत्परता दाखवण्यात आली, तीच तत्परता प्रत्यक्ष मदत मिळवून देताना दाखवली पाहिजे. असे झाल्यास संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details