लातूर - निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील पिके सध्या पाण्यात आहेत. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. कृषी विभागाला शेतीचे पंचनामे करण्याचे आदेशही दिले तरीही शेतकऱ्यांची फरफट सुरूच आहे. पीक विमा भरून घेण्याच्या सूचना असतानाही उदगीर तालुका कृषी कार्यालयात मनमानी कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जात आहेत परंतु, त्याची पोहच दिली जात नाही.
सततच्या पावसाने खरिपातील सोयाबीन, उडीद, तूर, मूग पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतातून बाहेर येण्याअगोदर आमदार, खासदारांनी पिकांची पाहणी केली. कृषिमंत्री दादा भुसे यांनी देखील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामेकरून ज्या शेतकऱ्यांनी विम्यासाठी ऑनलाइन अर्ज केलेले नाहीत त्यांचे ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याच्या सूचना विम्या कंपन्या आणि कृषी विभागाला भुसे यांनी दिल्या. मात्र, मंत्र्यांच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांची परवड सुरूच आहे. उदगीर तालुका कृषी कार्यालयात विम्याचे अर्ज दाखल करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.