लातूर- वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल करण्यात आले आहे. पण, दरम्यानच्या सहा महिन्यातील परिस्थितीचा परिणाम अद्यापही जाणवत आहे. बाजारपेठ पूर्वपदार तर आलेली नाहीच, पण लॉकडाऊन लागूनच दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईचा परिणाम सर्वसामान्य कुटुंबावर प्रकर्षाने जाणवत आहे. खर्च वाढला असून उत्पन्न घटले आहे. सहा महिन्यांपासून विस्कटलेली घडी अद्यापही बसलेली नाही.
खर्च वाढला, उत्पन्न घटलं अन कोरोनामुळे जीवनच बदललं...! कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. यामुळे अनेकांचे उद्योग-व्यवसाय अडचणीत आले आहेत. कुणाला बेरोजगारीला सामोरे जावे लागले आहे. मात्र, या काळात परिस्थितीशी सामना करीत महिलांनी घर संभाळलेले आहे. लॉकडाऊनमध्ये तर घरातील सर्वच सदस्य हे बसून होते. त्यामुळे साहजिकच स्वयंपाक घराचे बजेट तर वाढले होते, पण केवळ अत्यावश्यक वस्तुंना महिलांनी प्राधान्य दिले आहे. राज्यात अनलॉक सुरू होऊन दीड महिना उलटला आहे. मात्र, तरीही जीवन पूर्वपदावर आलेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी आर्थिक चणचण भासत असल्याने नागरिकांची खरेदीची मानसिकता नाही. शिवाय दिवसेंदिवस अत्यावश्यक वस्तूंचे दर हे वाढत आहेत.
हेही वाचा -सास्तुरच्या 'त्या' घटनेवरून भाजपा- शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची
डाळ, तेल, भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले असल्याने केवळ अत्यावश्यक वस्तुंना प्राधान्य देत बजेट महिलांनी आटोक्यात ठेवले आहे. शिवाय गेल्या सहा महिन्यांपासून सॅनिटाईजर, मास्क, हँडवॉश यासारख्या वस्तूंची भर पडली आहे. घरकामाबरोबर लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्या महिलांचीही मोठी अडचण झाली आहे. बाजारपेठेत उलाढालच नसल्याने अनेकांनी उद्योगाला टाळे ठोकले आहेत. तर काहींचा खर्चही निघत नसल्याने अडचणीत आहेत. कोरोनाच्या काळात इतर वस्तूंच्या खरेदीत मोठी घट झाली होती. अद्यापही केवळ कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढ्याच वस्तूंची खरेदी केली जात आहेत. त्यामुळे अडचणीत असलेल्या मध्यम वर्गातील नागरिकांनी महागाई वाढली तरी तडजोड करून किचनचे बजेट हे वाढू दिलेले नाही. महागाईवर निर्बंध नाहीत आणि दुसरीकडे उत्पादनात वाढ नाही, त्यामुळे प्रश्न कायम आहे की जगावं कसं...?
वर्षभरातील प्रत्येक सणावर कोरोनाचे संकट कायम होते. सध्या अनलॉकची स्थिती असली तरी बाजारपेठेतील शुकशुकाट पाहता लॉकडाऊनच कायम असल्यासारखी स्थिती आहे. मध्यम वर्गातील महिला महिन्याकाठी 3 हजार रुपयांचा किराणा माल खरेदी करीत होत्या, आता तो अडीच हजारावर येऊन ठेपला आहे. कोरोनामुळे जीवन पद्धतीतच बदल झाला असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा -लातूर : भूसंपादन न करता शासनाकडून हायवेचे काम सुरू, पोलीस व शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची